बैल पोळा/ बैल पोळा या सणा विषयी माहिती/ Bail Pola

     


  

             वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे "बैलपोळ्याचा दिवस" होय. "बैलपोळा" हा सण भाद्रपद महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी येणारा एक सण आहे. विशेषत: हा सण महाराष्ट्र, छत्तीसगड मध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये या सणाला "बेंदूर" या नावानेही ओळखले जाते. हा सण भारतातल्या विविध ठिकाणीही साजरा केला जातो.

        आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे बरेच लोक हे शेतीवरच अवलंबून आहेत. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतीतल्या कामासाठी बैलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आजच्या या आधुनिक युगात काही लोक हे शेतीसाठी ट्रॅक्टरचा व विविध यंत्रणाचा वापर करत आहेत. पण आजही काही लोक असे आहेत जे की, शेतीतील कामासाठी म्हणजेच नांगरणी, पेरणी यासाठी बैलांचा वापर करत आहेत. तसेच शेतीतील काही धान्य किंवा अवजारे आणायचे असतील तर बैलगाडीचा वापर केला जातो. शेतीचा व्यवसाय हा बैलांवरतीच आधारित असतो. परंतु आजच्या या आधुनिक युगात नवनवीन यंत्रणा आल्यामुळे कुठेतरी बैलांचे महत्त्व कमी होत चालले आहे. 

       बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी हा आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन काढतो. धुऊन काढल्यानंतर वेगवेगळ्या रंगांनी रंगवतो व सजवतो. बैलांच्या शिंगाला पण मस्त रंग देतो व त्यांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा घातल्या जातात. अशाप्रकारे प्रत्येक शेतकरी आपोआपल्या बैलांना सजवतो व सजवून झाल्यानंतर गावातील सगळ्या बैलांना एकत्रित आणून त्यांना पळवले जाते तसेच त्यांच्या पुढे नाचले पण जाते. बैल पळत असताना मुले त्यांचा आनंद घेत असतात. बैलांपुढे बेसूद नाचत राहतात. नंतर प्रत्येक जण आपोआपल्या बैलांना घरी घेऊन जातात. बैलांना घरी आणल्यानंतर त्यांची पूजा केली जाते व त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाकही बनवला जातो. मग बनवलेल्या पोळ्या या बैलांना खाऊ घालतात. घरातील वडीलधारी तसेच छोटे मुले ही बैलांच्या पाया पडतात. शेतकरी आपल्या बैलांची देवाप्रमाणे पूजा करतात. 

         बैलपोळ्याच्या दिवशी ज्या लोकांच्या घरासमोरून बैल जातात तेही लोक बैलांची पूजा करतात. शहरामध्ये बैल नसल्यामुळे लोक कुंभाराकडून बनवलेली मातीची बैल घरी घेऊन येतात व त्यांची पूजा करतात. बैल पोळा या सणादिवशी बैलांचा वापर हा कोणत्याच कामासाठी केला जात नाही. आपण गाय व बैल तसेच कोणत्याही मुक्या प्राण्यांना मारले नाही पाहिजे. माणसांसाठी तर कोणी पण कृतज्ञता व्यक्त करू शकतो, परंतु मुक्या प्राण्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेषत: जगामध्ये फक्त भारतीय संस्कृतीमध्ये पहायला मिळते. 

       एका प्रसिद्ध कथेनुसार श्रीकृष्णाच्या जन्मानंतर लगेचच कंसाने त्यांना मारण्यासाठी पोळासूर या नावाच्या राक्षसाला पाठवले होते, पण त्या राक्षसालाही श्रीकृष्णाने आपली लीला दाखवून मारून टाकले होते आणि सगळ्यांना अचंबित करून टाकले होते. तो दिवस भाद्रपद महिन्याच्या अमावस्येचा होता आणि त्या दिवसापासूनच या घटनेला पोळा म्हटले जाऊ लागले. 

       पोळा हा सण प्रामुख्याने शेती व शेतकऱ्यांशी संबंधित आहे. असे प्राणी जे शेतकऱ्याला मदत करतात जसं की गाय, बैल इत्यादी. विशेषत: बैलांना सन्मान देण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैल हा शेतकऱ्यांच्या जीवनातील खूप महत्त्वपूर्ण वाटा असतो. कुठे-कुठे तर हा सण दोन दिवसही साजरा केला जातो. आपल्या मित्राला धन्यवाद देण्यासाठी शेतकरी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा करतो. बैल पोळा सण साजरा करण्यामागचा उद्देश प्राण्यांची पूजा, आराधना करणे हाच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.