एक आदर्श गाव हिवरेबाजार/Ek Aadarsh Gav Hivarebazar
काही ठराविक माणसेच असतात जी आपल्या स्वतःसाठी तर जगतात पण इतरांनाही जगण्यासाठी मदत करतात. असंच एक आदर्श व्यक्तीमत्व असणारे म्हणजेच माननीय पोपटराव पवार हे होय. यांच्या बद्दल सांगायचे झाले तर हे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावचे सरपंच होते व आता उपसरपंच म्हणून काम करत आहेत. नुसते उपसरपंच नाही तर त्या गावचे सर्वस्व आहेत. पोपटराव पवारांनी एका गरीब गावाला विकासाच्या मॉडेलमध्ये रूपांतर केले आहे. त्यांनी हिवरेबाजार सारख्या दुष्काळी गावाला हरित आणि समृद्ध बनवलेले आहे. त्यांनी 2007 मध्ये समाजाच्या नेतृत्वाखाली जलसंधारणासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवलेला आहे. पोपटरावांसारखे सरपंच जर सगळ्या गावाला मिळाले तर प्रत्येक गाव हे आदर्श गाव बनेल.
हिवरेबाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. हिवरेबाजार हे गाव इतिहासात घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध होते. यामुळे या गावाच्या पुढे बाजार हा शब्द लागलेला आहे. गावात पूर्वी अन्य प्राण्यांचाही बाजार भरायचा व बाजारामध्ये घोड्यांची व हत्तींची खरेदी सुद्धा व्हायची. अगोदर हे गाव दुष्काळग्रस्त होते आणि दूध दुखते ही खूप होते यामुळे या गावात पहिलवान ही तयार होत असायचे. काही दिवसांनी दुधाची जागा दारुनी घेतली आणि मारामाऱ्या होऊ लागल्या. हिवरे बाजार या गावाला दुष्काळग्रस्तापासून ते आदर्श गाव बनवण्यात सरपंच पोपटराव पवार यांची मुख्य भूमिका आहे. सन 1989 पासून हिवरेबाजार हे गाव सरपंच पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सुधारित झाले.
हिवरे बाजार या गावातील ग्रामपंचायत, शाळा यांचे पण एक वेगळेच चित्र या गावात पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर डोंगरावरती चर खोदलेले आहेत. या चरांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते व पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे पाण्याची टंचाई ही भासत नाही. गावामध्ये रस्ता, पाण्याची सोय, लाईट अशा प्रत्येक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. प्रत्येक घरामध्ये शौचालय आहेत आणि गावातील लोक त्याचा वापरही करतात. गावात कोणत्याही ठिकाणी गेलो तर प्रत्येक ठिकाणी स्वच्छताच दिसते कारण हिवरेबाजार या गावातील लोक नुसती घराचीच नाही तर बाहेरील परिसराची पण स्वच्छता ठेवतात. एक प्रकारे हिवरेबाजार हे स्वच्छतेचे महान उदाहरण आहे. एवढेच नाही तर या गावातील एकही माणूस तंबाखू, सिगारेट व दारू या व्यसनाच्या आहारी जाताना दिसणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे गाव पूर्णपणे व्यसनमुक्त आहे. या गावातील 90% कुटुंबांमध्ये एक तरी व्यक्ती सरकारी नोकरीला आहे. या गावातील लोक कोणताही कार्यक्रम मिळून मिसळून साजरी करतात.
लोकांचा एकजूटपणा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्याही अशक्य गोष्टी या शक्य होतात. असाच एकजूटपणा या गावातील लोकांमध्ये आहे. तसेच गावामध्ये साक्षरतेचे प्रमाण देखील जास्तीत जास्त आहे. त्यामुळे आज हिवरेबाजार हे एक आदर्श गाव आहे. या गावाचा सगळ्यांनी आदर्श घेऊन आपल्या गावाला ही आदर्श गाव बनवायला पहिजे.
Post a Comment