ध्येयप्राप्ती/Dheyprapti
प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या जीवनात काही ना काही तरी ध्येय ठरवत असतो.आणि जे व्यक्ती आपल्या ध्येयप्राप्तीसाठी रात्रंदिवस मेहनत करतात तेच आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. जे व्यक्ती आपल्या ध्येयापासून मागे हटतात, ते आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. मग त्यांच्याकडे उरतो तो फक्त पश्चातापच.
आपण लहान असताना मोठमोठी स्वप्ने पाहतो. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, तर कोणाला इंजिनियर अशा विविध प्रकारचे स्वप्न आपण पाहत राहतो. स्वप्न पाहणे हे काही चुकीचं नाही. पण पाहिलेलं स्वप्न पूर्ण न करणे ही मात्र आपली चूक आहे. पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. ध्येय म्हणजे दुसरं काही नसून आपण जी गोष्ट ठरवली आहे ती मिळवण्यासाठी केलेले कष्ट आणि अपार मेहनत होय.
आज मोठमोठ्या व्यक्तींची आपण पुस्तके वाचतो. आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांचे व्याख्यानही ऐकतो. या लोकांनी यशस्वी होण्यासाठी अफाट मेहनत त्याबरोबरच कित्येक अडचणींना तोंड दिलेले असते. त्यामुळेच ते आपल्या आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व पाहून आपल्यालाही असे वाटते की मला पण त्यांच्यासारखेच व्हायचे आहे. पण आपण फक्त ठरवतो, बोलतो आणि काही करायचे म्हटले की मग मात्र कंटाळा येतो. काहीजण ध्येयप्राप्तीसाठी सुरुवात तर करतात, पण मध्येच सोडून देतात व कारणे देऊ लागतात की ,माझ्याकडून नाही होणार हे, खूप अवघड आहे. अवघड तर काहीच नसतं सगळं काही सोप असत .सुरुवातीला आपल्याला अवघडही वाटू लागते, त्यामध्ये काही शंकाच नाही. परंतु अवघडला सोपे बनवणे हे आपले काम असते आणि जे याला जमते तोच ध्येयप्राप्तीच्या मार्गावर चाललेला असतो . आणि शेवटी चालून -चालून एक ना एक दिवस ध्येयापर्यंत पोहोचतोच.
आपल्याला आयुष्यात काही करायचे असेल तर पटकन निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. आणि नुसताच निर्णय घेऊन थांबले नाही पाहिजे, तर लगेचच कामाला लागले पाहिजे. कधी निर्णय बरोबरही असू शकतो आणि कधी चुकीचाही. निर्णय बरोबर असेल तर यश, ध्येय मिळेल व निर्णय चुकीचा असेल तर त्या चुकीतून आपल्याला अनुभव मिळेल. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता ही वाढते.
या आयुष्याच्या प्रवासात काही समस्या ही उद्भवतात पण त्याला बाजूला सारून पुढे जाण्याचा मार्ग आपण स्वतःच काढला पाहिजे. ते म्हणतात ना जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप मनापासून ठरवतो ना तेव्हा पूर्ण जग तुमच्यासाठी यश देण्याच्याच प्रयत्नात असते हे ज्याला कळते तोच आयुष्यात यशस्वी होतो.
प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण पूर्ण मनापासून पार पडायलाच हवे. एक वेळेस अपयश येईल ,दुसऱ्या वेळेस ही अपयश येईल, पण असं तोपर्यंत घडेल जोपर्यंत तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी योग्य बनत नाहीत. परंतु एक ना एक दिवस ध्येय प्राप्ती तर निश्चितच आहे. अपयश हा एक ध्येयाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्याला स्वीकार करायला शिकले पाहिजे व पुढे चालायला शिकले पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना-"अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आणि आपल्या जीवनाची डायरी असते." जर आपले ध्येय ठरलेले असेल तर अपयश काय, या जगात आपल्याला कोणीच अडवू शकत नाही .फक्त आपल्या प्रयत्नावर ठाम राहिला शिकले पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे .ध्येय प्राप्ती होईपर्यंत आपल्याला कितीही चांगले किंवा वाईट अनुभव मिळतात . पण ते अनुभव आपल्याला जगायला शिकवतात.
Post a Comment