प्रवासातील दोन क्षण../ Pravasatil don kshan...



नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठले, 
पण काम आवरता आवरता कधी उशीर झाला हे कळलेच नाही. 
मला वाटलं आज बस निघून जाते की काय? 
पटकन मुलांना आवरून शाळेत पाठवलं ,व कशीबशी आवरून स्टॅन्ड वरती आले. 


पाहते तर काय! दररोजच्या पेक्षा तर जास्तच गर्दी होती,
वाट पाहतच होते की तेवढ्यात बस आली,
सर्वांची घाई चालूच होती, कारण जागा मिळवायची होती,
धक्काबुक्की करत लो बसमध्ये चढत होती, 
कशीबशी मी पण बसमध्ये चढली,
पण बसायला जागा नव्हती, मग मी उभीच राहिली.


माझ्या जवळच दोन म्हाताऱ्या आजी बसल्या होत्या, 
त्यांना माझी दया आली की काय माहित नाही?
पण त्यांनी मला बसायला जागा दिली,
तसंच मी कशीबशी एका कोपऱ्यावर बसली.


त्यांनी मला विचारले-कुठे जायचं ग, बाई तुला, 
मी म्हटलं-इथेच जायचंय समोरच्या गावाला,
तुम्हाला कुठे जायचं आहे, मी पण विचारले त्यांना,
काय सांगू बाई तुला? 
सकाळपासून बसलोय, पाय पण ताठवून गेली नुसती,
पोटात बी काय नाय 


तेवढ्यात दुसऱ्या आजी म्हणाल्या-
अगं गेलो होतो लेकाला भेटायला मोठ्या शहरात, 
काय त्या मोठ-मोठ्याल्या बिल्डिंगी,
काय ती माणसे गर्दीच नुसती. 


मला पण राहावल नाही मी पण त्यांना म्हटलं-
मग राहायचं ना दोन-चार दिवस आणखी,
लगेचच परतीचा प्रवास का? 
अगं, घरी गुर-ढोर, शेत-पोत 
वाट पाहत असतील माझी अगदी आतुरतेने. 


 अगं जेवढी आतुरता माझ्या जनावरांना,मातीला आहे ना, 
तेवढी माझ्या पोटच्या पोराला बी नाय गं.
दोनच दिवस होते, पण सुनेनी ना आईसारखं वागवलं ना लेकाने.
पोराला नोकरी लागावी, शहरात जाऊन राहावं,
याच आशेने पोराला जीवाचं रान करून शिकवलं.
पण काय बी उपयोग नाही झाला त्याचा,
बायको आली की, पोरग विसरला बगं आईला, 
दोनच दिवस होती, पण कधी तेथून बाहेर पडेल असं झालं होतं,
घरी म्हातारपण वाट बघत असेल माझी.

 
अगदी निरागसपणे मी हे ऐकतच होते, 
मनात विचार आला की, 
कोण कोणाचं असतं आणि कोण कोणाचं नसतं, 
हे वेळ आल्यावरच कळतं.
कधी आपली माणसं परकी होतात तर कधी परकी आपली होतात हे कळतच नाही,
आणि हे सर्व आयुष्याच्याच प्रवासात शिकायला मिळतं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.